बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – Balbharati Poem Songs – 7
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – Balbharati Poem Songs – 7
लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे
बालभारतीच्या कवितेची गाणी यातील इयत्ता १ली ते ६वी मधील कविता आपण भाग १ ते भाग ६ यात वाचल्या आणि ऐकल्या देखील. आजच्या भागात बालभारतीने वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील इयत्ता ७वी (प्रथमावृत्ती १९७०) मधील कवितेची गाणी ऐकणार आहोत.
पहिल्या भागातील प्रस्तावना वाचण्यासाठी येथे क्लिक करा:
लहानपणीचा काळ किती सुखाचा असतो, हे आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. लहान असताना आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा यांच्याकडून लाड पुरवून घेण्याचे ते दिवस. आपल्याला खेळवताना त्यांनी आपल्यासाठी गायलेले बडबडगीत, झोपवताना गायलेले अंगाईगीत अशा गाण्यांनी आपल्यावर बालपणीच गाण्यांचे संस्कार झालेले आहेत. त्यावर कळस म्हणजे शाळेत गेल्यावर पहिलीपासून वाचलेल्या बालभारतीच्या पुस्तकातील कविता आणि गाणी!
मराठी माध्यमातून जे शिकले आहेत त्यांनी हा अनुभव नक्कीच घेतला आहे.
मराठी वाड्मय किती प्रगल्भ आहे, हे त्या कविता पुन्हा वाचताना आता जाणवते. विविध कवींनी आपले वैविध्य राखत वेगवेगळया विषयांवर लिहिलेली बालगीते किंवा कविता बालभारतीच्या पुस्तकांत वाचावयास मिळतात. या कवितेला बाईंनी छान चाल लावलेली असायची, त्यावर आपण त्या कवितेचे रूपांतर गाण्यात करून गात असू.
पण आपणास ठाऊक आहे का? आपल्या आवडीच्या बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत हे बहुसंख्य लोकांना ठाऊक नाही. ‘मामाच्या गावाला जाऊ या’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ अशी काही चित्रपटात वापरलेली गाणी सोडली तर ह्या कवितेची गाणी आपण ऐकलेली नसायाची, किंवा विसरून गेलो असू.
याबरोबरच आश्चर्याची अन न भूतो न भविष्यती अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे अर्थात ‘बालभारती’ यांनी १९६५ साली इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येकी २ कविता/गाणी घेवून त्यावर चक्क ध्वनीमुद्रिका काढलेल्या होत्या. (त्यातील ६वी च्या गाण्यांची ध्वनीमुद्रिका सापडत नाही).
ईयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या बालभारतीच्या विविध आवृत्यांमध्ये तशी एकूण ३० हून अधिक गाणी सापडली आहेत. त्यातही बरीच गाणी आज घडीला कुठेच उपलब्ध नाहीत. हि गाणी यापुढे अशीच दुर्लक्षित न राहता हा ठेवा भावी पिढीकरीता जतन करून ठेवावा ह्यासाठी हा प्रपंच!
आजच्या या भागात आपण ईयत्ता १ली ते २री च्या बालभारतीच्या पुस्तकांत असलेल्या काही कविता गाण्यांच्या रुपात ऐकूयात, सोबतच त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या गाण्यांबरोबरच ध्वनीमुद्रिकेच्या मुखपृष्ठाचे आणि ध्वनीमुद्रिकेचे छायाचित्रे, कवींची थोडक्यात माहिती, पुस्तकातील कवितेच्या पानाचे छायाचित्र इत्यादी देवून लेख अधिक आकर्षक तर केलाच आहे, शिवाय गाणे हि ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. यातील बरीच गाणी हि १९५३ ते १९७० या कालावधीत प्रसिद्ध झालेली आहेत. पण काही गाणी मात्र १९९० च्या दशकानंतर तयार झाली आहेत.
[या लेखमालिकेकरिता घेतलेल्या कविता /गाणी ह्या बालभारतीने इयत्ता १ली ते ७वी करीता वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील आहेत. त्यानंतर साधारण वर्ष १९७६ पासून २ऱ्या मालिकेतील पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामुळे १ल्या मालिकेतील कविता आणि गाणी २ऱ्या मालिकेतील वेगवेगळ्या इयत्तेमध्ये आढळून येतील.]
भाग ७वा सुरु
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – Balbharati Poem Songs – 7
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या
आजच्या भागातील, म्हणजे इयत्ता ७वीतील पहिली कविता आहे, “गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या……”.
मराठीतील श्रेष्ठ कवी ‘बी’ (नारायण मुरलीधर गुप्ते) यांनी लिहिलेली ही कविता म्हणजे एका गरीब बापाने आपल्या छकुलीची समजूत घालताना मांडलेले शब्द आहेत.
कुणा एका शेजारच्या घरातील कार्यक्रमाला अथवा शाळेत गेलेल्या चिमुकलीचा काही कारणामुळे अपमान होतो, पण ती तशीच अपमान गिळून घरी येते, आणि बाबा दिसल्यावर तिचा बांध फुटतो, त्यावर तिचे वडील तिची समजून घालतात. शेवटी ‘आता देवाच्या गावाला जातो, आणि देवाला विचारून येतो’ असे बाबा म्हणतात, यातील ”गावाला जातो” हे शब्द कानी पडताच ”मी पण येते गावाला” असे म्हणत ती चिमुकली स्वतःचे दुःख विसरून जाते, ह्याचे अतिशय भावूक वर्णन कवीने ह्या कवितेत केले आहे.
लहान मुलगा असो वा मुलगी, सर्वांनीच ह्या प्रसंगाचा अनुभव ह्या ना त्या कारणाने लहानपणी घेतलाच आहे. ही कविता वाचताना अथवा ऐकताना आपल्याला तो प्रसंग आणि त्यानंतर आई अथवा वडीलांनी आपली कशी समजूत घातली ह्याची आठवण नक्कीच येईल आणि आईबाबांच्या आठवणीने डोळे भरल्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनवरील अक्षरे धूरकट होतील.
साधारण १९९०च्या दशकात ‘आठवणीतील कविता भाग १ ते ४’ ह्या चार भागात शाळेत शिकलेल्या कवितांचा संग्रह मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. त्या संग्रहात जुनी मराठी वाचनमाला आणि नवीन बालभारतीच्या पुस्तकांतील निवडक कवितांचा समावेश होता. त्याचे संपादक केले होते पद्माकर महाजन, दिनकर बरवे, रमेश तेंडुलकर, राम पटवर्धन अशा दिग्गज साहित्यकारांनी. त्यावरून प्रेरणा घेवून वर्ष २०१५ मध्ये मुंबईच्या मुलूंड उपनगरातील रसिक संगीततज्ञ श्री. विरेंद्र गोपुजकर यांनी शाळेत शिकविलेल्या ह्या कवितांच्या चालीमध्ये थोडीफार सुधारणा करून काही निवडक गाण्यांना नव्याने संगीतबद्ध आणि ध्वनिमुद्रण करून त्याची सीडी प्रसिद्ध केली होती. त्यातील गाण्यांच्या चाली पारंपारिकच ठेवल्या होत्या. त्यामुळे हि सर्व गाणी एक वेगळा अनुभव देतात. ह्या सीडीमधील गाण्यांचे संगीत रूपांतर श्री. विरेंद्र गोपुजकर आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी केले आहे, तर गाणी स्वरबद्ध केली आहेत, सुप्रसिद्ध गायक संगीतकार श्रीधर फडके, आशा खाडिलकर, उदय कुडतरकर आणि अन्य गायकांनी.
चला तर हा आता वाचूया आणि ऐकूया वर उल्लेखलेल्या आठवणीतील कविता’ ह्या अल्बम मधील आजचे पहिले गाणे “गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या……”. गायक आहेत उदय कुडतरकर, संगीत संकल्पना श्री. विरेंद्र गोपुजकर. ह्याच संग्रहातील ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे ….’ हे गाणे आपण ह्याच पूर्वी ‘बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा’ मध्ये ऐकलेले आहे.
बालभारतीच्या पुस्तकात ह्या कवितेची एकूण ११ कडवी वाचावयास मिळतात. परंतु मूळ कविता हि २५ कडव्यांची आहे. तसेच ध्वनिमुद्रित केलेल्या गाण्यात मूळ कवितेमधील एकूण १० कडवी वापरली आहेत. ह्या तिन्ही विरोधाभासांमुळे ह्या दोन्ही कविता वाचणे आणि गाणे ऐकणे ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळा आंनद देतात.
बालभारतीच्या पुस्तकातील कविता
२५ कडव्यांची मूळ कविता – (संग्राहकाचे नाव: अवंती. सौजन्य: https://aisiakshare.com/node/5440)
कवी: बी (नारायण मुरलीधर गुप्ते) यांच्यावरील इतर लेख आणि कवितेचे रसग्रहण
गवतफुला रे गवतफुला
आजची दुसरी कविता आहे, ‘गवतफुला रे गवतफुला…’.
पुढची कविता आहे साहित्य अकादमी पुरस्कार आणि अन्य पुरस्काराने सन्मानित झालेल्या सुप्रसिद्ध मराठी भावकवीयत्री इंदिरा संत यांची. बालकथांपासून लेखनास प्रारंभ केलेल्या इंदिरा संत यांनी मराठी आणि मानसशास्त्र ह्या विषयांच्या अध्यापिका म्हणून आणि बेळगाव येथील ‘मराठी ट्रेनिंग कॉलेज’च्या प्राचार्या म्हणून १९५६ ते १९७४ या काळात त्यांनी काम केले आहे. त्यांचे पती नारायण संत हे देखील कवी होते. दोंघांच्या कवितांचा एकत्रित संग्रह ‘सहवास’ या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. पतीच्या अकाली निधनामुळे अवघ्या दहा-बारा वर्षांचे वैवाहिक आयुष्य लाभलेल्या इंदिराजींनी पुढचे आयुष्य साहित्यकृतींना वाहून घेतलेले दिसते. त्यांच्या अनेक काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळालेले आहेत.
गावाबाहेर माळावरती पतंग उडविण्यासाठी गेलेल्या मुलाला मैदानातील गवतात अचानक एक रानफुल दिसते आणि तो मुलगा हरखून जातो. त्या फुलाबरोबर तो आपल्या मनोराज्यात रमून जातो. याचे खूप छान वर्णन कवीयत्रींनीं केले आहे, त्याचा अनुभव घेण्यासाठी त्या मुलाबरोबर आपल्यालाही माळावरती जावे लागेल. या कवितेत ‘रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला, निळनिळूली’ असे जोडशब्द वापरून कवीयत्रींनीं बडबडगीताचा एक छान परिणाम साधला आहे.
२०१७ मध्ये जि. प. उच्च प्राथमिक शाळा, घोडेगाव (कोळोणा), ता. देवळी, जि. वर्धा ह्या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गणवीर यांनी ह्या कवितेला उत्कृष्ट चाल लावून त्यांच्याच शाळेतील इ. ७वीतील विद्यार्थी गायक ऋषभ ठवळी आणि मिनल लोखंडे, सोफिया पठान, प्राची लभाने व पायल यांच्याकडून गाऊन घेतले आणि त्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण केलेले आहे. ह्या गाण्याचे संगीत संयोजन केले समीर बोटरे यांनी. फारच छान असा हा उपक्रम त्यांनी केला आहे.
आता वाचूया आणि ऐकूया गवतफुला रे गवतफुला …..’, हे सर्वच लहानथोरांच्या आवडीचे बालगीत. शेवटी वरील गाण्याची व्हिडिओची युट्यूब लिंक दिली आहे.
कशाले काय म्हनू नही
आजची तिसरी कविता आहे, ‘कशाले काय म्हनू नही …..’ खानदेशातील आहिराणी भाषेत काव्य करणाऱ्या सुप्रसिद्ध कवियत्री बहिणाबाई चौधरी ह्यांची ही रचना आहे. बहिणाबाई चौधरी ह्या रूढार्थाने कवियत्री नव्हत्या. त्या पूर्णपणे निरक्षर होत्या. परंतु त्यांची प्रतिभा उच्च होती. घरकाम करताना, दळण दळताना, शेतात काम करताना त्या उत्स्फुर्तपणे त्यांच्या मनातले विचार ओवीच्या रूपात व्यक्त करीत असत. ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांचे धाकटे पुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी आणि त्यांच्या मावसभावाने बहिणाबाईंच्या ह्या रचना टिपून ठेवल्या. पुढे बहिणाबाईच्या निधनानंतर (१९५१) कवी सोपानदेव चौधरी ह्यांनी ह्या कवितांचे हस्तलिखित आचार्य अत्रे यांना दाखविल्यावर, अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. वर्ष १९५२ प्रकाशित झालेल्या ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत. बहिणाबाईच्या ह्या कवितांमध्ये निसर्ग, वारा, पाऊस, शेती, पक्षी, सारा, माहेर अशा विविध विषयांबरोबरच आयुष्याचे सार अतिशय सोप्या आणि बोली भाषेत त्यांनी मांडलेले दिसून येते. शिवाय ह्या रचना ओवी रूपी असल्याने त्यांना गाण्याची चाल छान लावता येते.
इयत्ता ७वीच्या पुस्तकातील बहिणाबाईंची अशीच एक कविता संगीतकार यशवंत देव ह्यांनी संगीतबद्ध केली आहे. वर्ष २००१ मध्ये सागरीका म्युझिक कंपनीने बहिणाबाईंच्या निवडक १६ गाण्यांच्या २ सीडी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यातील सर्व गाणी उत्तरा केळकर यांनी गायली आहेत. त्याच संचातील ‘बिन कपाशीने उले ….’ कविता आपण वाचूया आणि ऐकूयात.
कवीयत्री बहिणाबाई चौधरी यांच्यावरील काही निवडक लेख
- बहिणाबाई चौधरी – मराठी साहित्यातील अजरामर कवियत्री: https://marathiworld.com/ वरील लेख
- डॉ. पावन मांडवकर, प्राचार्य, इंदिरा महाविदयालय, कळंब, जि. यवतमाळ यांनी लिहिलेल्या ‘बहिणाईची गाणी : सौंदर्य आणि समीक्षा (Songs of Bahinabai: Beauty and Review)’ ह्या ग्रंथाची प्रत वाचा
- ‘खानदेशी रत्न बहिणाबाई चौधरी’ – लेखक: भारतकुमार राऊत
मायेविण बाळ क्षणभर न राहे
आजची चौथी कविता आहे, गाणे: ‘मायेविण बाळ क्षणभर न राहे…’,
सर्व संतांनी विठ्ठलाला ‘माऊली’ म्हटलेले आढळते. विठ्ठलाच्या ठायी त्यांना आईचेच प्रेम मिळाले आणि बालकाच्या मनी कायम आईचीच ओढ असावी तशी सर्व संताना विठ्ठलाची ओढ होती. हे त्या सर्व संताच्या वाड्यमयात दिसून येते.
संत तुकाराम महाराजांनी नेहमीच त्यांचे विठ्ठल माऊली प्रति असलेले प्रेम दाखविले आहे. हाक मारली कि आईसारखे लगेच तो धावून येईल, आपण रडलो की आईच्या मायेने तो आपले सांत्वन करील असे तुकोबांना नेहमीच विठ्ठलाविषयी वाटते. ‘लडीवाळ बाळकें, तूं ची आमुची आई’ असे एके ठिकाणी तुकोबांनी लिहिले आहे.
आजच्या ह्या अभंगात संत तुकाराम महाराजांनी हेच भाव व्यक्त केले आहेत, कसे ते त्यांच्याच शब्दात वाचूया आणि सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजात ऐकूयात, गाणे संगीतबद्ध केले आहे कमलाकर भागवत यांनी.
पसायदान
आजची शेवटची कविता आहे, ‘पसायदान’.
केवळ बालभारतीच्या पुस्तकात कवितेच्या विभागामध्ये छापली गेली म्हणून त्यास कविता म्हणायचे. खरे तर ‘पसायदान’ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेली एक वैश्विक प्रार्थना आहे. ‘भावार्थ दीपिका’ अर्थात ‘सार्थ ज्ञानेश्वरी‘ ग्रंथाच्या निर्मितीचा यज्ञ पूर्ण केल्यावर संत ज्ञानेश्वरांनी ग्रंथाचा समारोप करताना या वाड्यमरुपी यज्ञदेवतेकडे मागितलेले दान म्हणजेच हि ‘पसायदान’रुपी प्रार्थना! आणि हे दान ज्ञानेश्वरांनी मागताना स्वतःसाठी न मागता सर्व विश्वासाठी, सर्व प्राणिमात्रांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठी मागितले, हे पसायदानाचे वेगळेपण आहे. साधारण ७३० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’चा समाजातील सर्व घटकांवर प्रभाव आजही कायम आहे. प्रत्येक वेळेस ‘ज्ञानेश्वरी’चे पारायण करताना सापडलेला नवनवीन अर्थ वाचकास ‘ज्ञानेश्वरी’चे पुन्हा पुन्हा पारायण करण्यास भाग पाडते.
श्रीमद भगवद्गीतेवर संत ज्ञानेश्वरांनी केलेले भाष्य म्हणजेच ‘ज्ञानेश्वरी’ चा समारोप करताना ज्ञानेश्वरांनी ‘पसायदाना’ची रचना केली. आणि माझ्या ब्लॉगवरील ‘बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला ते भाग ७’ ह्या बालभारती मराठी पाठ्यपुस्तकामधील कवितांच्या लेखमालेच्या शेवटच्या भागातील शेवटची कविता सुद्धा ‘पसायदान’च असावे हा अकल्पित योगायोग मला चक्रावून टाकत आहे.
बालभारतीच्या कवितेची गाणी ह्या लेखमालेतील पाहिल्याच भागात लिहिल्याप्रमाणे ‘मराठी वाड्मय किती प्रगल्भ आहे’, हे संत ज्ञानेश्वरांनी कधीच जाणले होते, म्हणून तर ज्ञानेश्वर म्हणतात , ‘माझा मराठाचि बोलुं कौतुकें। परि अमृतातेंही पैजां जिंके। ऐसीं अक्षरें रसिकें। मेळवीन।। (ज्ञानेश्वरी – अध्याय ६वा, ओवी १४, गीताप्रेस, गोरखपूर संपादीत प्रत). ह्या लेखमालेचे सर्व ७ भाग वाचताना मराठी भाषेची प्रगल्भता आपण अनुभवली आहेच.
बालभारतीच्या संपादक मंडळाची पाठ्यपुस्तकात संतवाणी, अभंग इत्यादी देण्याची ही संकल्पना खरोखरच अद्वितीय आहे. कोवळ्या मनावर सुसंस्कार करण्याचे, खऱ्या अर्थाने लहान मुलांना सज्ञान करण्याचे मोलाचे कार्य बालभारतीच्या ह्या कवितांनी केलेले आहे, हे आता मागे वळून पाहिल्यावर जाणवते, त्याबद्दल बालभारतीचे धन्यवाद. (असो. जरा जास्तच लिहिले गेले माझ्याकडून. तेवढी माझी कुवत नाहीय, परंतु मनातले दुसऱ्याला सांगायची ऊर्मी दाबू शकलो नाही).
एकूण १८११ ओवी असलेल्या ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ ग्रंथांच्या १८व्या अध्यायात ओवी क्रमांक १७९४ ते ओवी क्रमांक १८०२ ह्या दरम्यान ज्ञानेश्वरांनी रचलेले काव्य म्हणजेच ‘पसायदान’.
ग्रामीण भागात आणि वारकरी समाजामध्ये ‘पसायदाना’स अनन्य साधारण महत्व आहे. चित्रपटातील गाणी तोंडपाठ असणारे आपण शहरी ‘पसायदान’ अद्याप मुखोद्गत करून शकलो नाही, हे आपले दुर्भाग्यच म्हणावयाचे. (अर्थात त्यात माझाही समावेश आहेच, पण आता ती चूक लवकरच सुधारून घेईन). ग्रामीण भागात भजन, कीर्तन, हरिपाठ, इतकेच नव्हे तर मृतात्म्यास श्रध्दांजली वाहताना एकमुखाने ‘पसायदान’ म्हटले जात असल्याने ते सर्व अबालवृद्धांना पाठ आहे.
असो. तर आता वाचूयात आणि ऐकूयात ‘बालभारतीच्या कवितेची गाणी’ ह्या लेखमालेतील शेवटची कविता अर्थात ‘पसायदान’. गायले आहे भारतरत्न लता मंगेशकर आणि त्यास संगीतबद्ध केले आहे पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर ह्या भावंडांनी! गाण्यात रूपांतर करताना सर्व ९ कडवी वापरली असली तरी, पाठ्यपुस्तकात मात्र केवळ पहिली ३ कडवी वापरलेली आहेत.
स्व. प्रा. राम शेवाळकर यांनी ‘पसायदान’ विषयी केलेलं भाष्य, साभार: ‘लोकराज्य’ ऑगस्ट २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘वारी’ विशेषांक वाचा
Source:https://ia801307.us.archive.org/2/items/859SriGyaneshwariMarathiWeb/859_Sri_Gyaneshwari%28Marathi%29_Web.pdf
मागील भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी- Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा: इयत्ता ५वी– Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा: इयत्ता ६वी– Balbharati Poem Songs
ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात. बालभारतीच्या कवितेनंतर ‘कुमारभारतीच्या कवितेची गाणी’ हि मालिका लवकरच येत आहे.
लेखनाचे सर्वाधिकार: लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८
बालभारती कवितेचा आजचा हा ७वा भाग आणि या अगोदरचे भाग १ ते भाग ६ आपणास आवडले असणार यात शंका नाही, यापुढील नवनवीन विषय वाचण्यास चूकवू नका. बालभारतीच्या कवितेनंतर ‘कुमारभारतीच्या कवितेची गाणी’ हि मालिका लवकरच येत आहे. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.
Balbharati Poem Songs हा लेख आपल्या मित्रमंडळींना सामायिक (Share) करा:
हा लेख लिहिण्याकरीता बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!
Acknowledgments:
- Vinyl Record Cover Images of Marathi Songs – Balbharati are taken from https://www.discogs.com/; Specially Manufactured by – The Gramophone Company Of India Ltd. For – Maharashtra State Bureau of Text Book Production, Pune.
- Vinyl Record Cover Images Contributor: Mr. Gawaskar (More details not found).
- गाण्यांची यादी आणि अधिक माहिती – List and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
- Images and List of Songs: https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- बालभारतीची जुनी पुस्तके डाउनलोड करण्याकरिताची लिंक (Download link of Balbharati Books): https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- List of Songs: https://balbharatikavita.blogspot.com/
- संतांचे चरित्र: https://www.santsahitya.in/
- List of Songs: http://marathikavitagani.blogspot.com/
DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.
अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.

Kekevali
Anyokti
Kavita kothe ahet
ह्या दोन्ही कविता इयत्ता ७वी ला (पहिली माला – १९६८ ते १९७१) होत्या.
खालील लिंकवर शोधले तर ते पुस्तक आपणास सापडेल.
https://books.ebalbharati.in/archives/
नाही सापडले तर पुन्हा सम्पर्क करा.