संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)
हिंदी चित्रपटाच्या संगीत सुवर्ण काळातील संगीतकार चित्रगुप्त याची सांगीतिक कारकीर्द १९४६ ते १९८८ एवढी प्रदीर्घ राहिली आहे. त्यांच्य्या ह्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे त्यांना विविध गायक आणि गायिका ह्यांच्याकडून आपली गाणी गाऊन घेण्याची संधी मिळाली. कारकिर्दीच्या सुरुवातीला म्हणजेच ४०व्या दशकाच्या उत्तरार्धात राजकुमारी, शमशाद बेगम, लक्ष्मी रॉय, मो. रफी, शांती शर्मा, दिलीप ढोलकीया यांसारख्या गायक, गायिकांपासून सुरुवात करून पुढे, मुकेश, तलत, आशा भोसले आणि लता मंगेशकर असे विविध गायक-गायिका चित्रगुप्त यांनी वापरले. पुढे कारकिर्दीच्या शेवटच्या टप्यात नवोदित गायक गायिका, सुरेश वाडकर, येसूदास, हेमलता, अलका याज्ञीक, आलिशा चिनॉय यांच्या आवाजाचा चित्रगुप्त यांनी वापर केला.
त्यांच्या ह्या गायकांच्या यादीत किशोरकुमार यांचे नाव घ्यावे लागेल. तुलनेने किशोरकुमार यांची गाणी संख्येने कमी असली, तरी गाणी दखल घेण्यासारखी आहेत. १९५० ते १९८२ पर्यंत किशोरकुमार यांचा आवाज चित्रगुप्त यांनी पार्श्वगायनाकरिता वापरला आहे. यातील बरीच गाणी ही अप्रसिद्ध किंवा न ऐकण्यातील आहेत. किंबहुना काही जणांना संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार हे समीकरण न पटण्यासारखे आहे. परंतु संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार यांच्या जोडीने खूपच छान गाणी रसिकांना दिली आहेत. आजच्या भागात आपण त्याविषयी जाणून घेवूया.
चित्रगुप्त ह्यांचा पहिला चित्रपट १९४६ मध्ये आला होता. किशोरकुमार यांनी चित्रपटातील पहिले गाणे १९४८ मध्ये ‘जिद्दी’ चित्रपटात गायले होते. चित्रगुप्त यांनी किशोरकुमार यांचा आवाज प्रथम १९५०च्या ‘हमारा घर’ ह्या चित्रपटात वापरला. ‘हमारा घर’ ह्या चित्रपटात शमशाद बेगम यांच्याबरोबर ‘कहा चले सरकार’ हे युगल गाणे किशोरकुमार यांनी चित्रगुप्त यांच्याकडे प्रथम गायले.
संगीतकार चित्रगुप्त आणि आणि गायक किशोरकुमार ह्या जोडीचे प्रथम ध्वनीमुद्रीत गाणे (Songs of Kishor Kumar and Chitragupta)
चला आता ऐकूयात संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार ह्या जोडीचे प्रथम ध्वनीमुद्रीत गाणे.
गाणे: ‘कहा चले सरकार’, चित्रपट: हमारा घर (वर्ष १९५०), कवी: राममूर्ती चतुर्वेदी, गायक: किशोरकुमार आणि शमशाद बेगम, संगीतकार: चित्रगुप्त. हे गाणे अतिशय दुर्मिळ आणि जुने असल्याने, गाणे संपादित करून देखील गाण्यात थोडी फार खरखर आहे. परंतु गाणे एकदा तरी नक्की ऐकावे असे आहे.
संगीतकार चित्रगुप्त यांच्याविषयीची आमच्या मागील भागातील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आता थोडे चित्रगुप्त यांच्याविषयी जाणून घेऊया. चित्रगुप्त यांचे पूर्ण नांव होते, ‘चित्रगुप्त श्रीवास्तव’. बिहारमधील आताच्या गोपालगंज तालुक्यात चित्रगुप्त यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. चित्रगुप्त यांचे वडील बंधू म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळी ब्रिटिशांविरुध्द ‘असहकार चळवळी’त भाग घेऊन १९३० साली तुरुंगवास भोगलेले निर्भीड पत्रकार, संपादक ब्रज नंदन ‘आझाद’. चित्रगुप्त यांच्यापेक्षा ते ११ वर्षाने मोठे होते. त्यांच्या कडक शिस्तीमुळे चित्रगुप्त यांनी अर्थशास्त्र आणि पत्रकारिता (M. A. – Economics आणि M. A. – Journalism) ह्या दोन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. त्या काळातील चित्रपटसृष्टीत चित्रगुप्त हे सर्वात जास्त शिक्षित होते. चित्रगुप्त यांनी लखनऊच्या सुप्रसिद्ध ‘भातखंडे संगीत संस्था’ ह्या नावाजलेल्या संस्थेतून गायन आणि संगीतकलेचे रीतसर शिक्षण घेतले होते. त्यांनी पाटणा कॉलेजमध्ये काही वर्षे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. परंतु बहुदा संगीतक्षेत्राकडे जास्त ओढा असल्याने त्यांनी पाटणा सोडून मुंबईला प्रस्थान केले.
१९४२ मध्ये मुंबईत आल्यावर ‘भातखंडे संगीत संस्था’ मधील चित्रगुप्त यांचे वरिष्ठ सहध्यायी ‘श्री नाथ त्रिपाठी’ (S. N. Tripathi) ह्या त्यावेळच्या यशस्वी संगीतकाराकडे गायक आणि संगीत सहाय्यक म्हणून चित्रगुप्त यांनी आपल्या नवीन कारकिर्दीला सुरुवात केली. चित्रगुप्त चांगले तबला वादक होते आणि त्यांना गायनाचीही आवड होती. पुढे संगीतकार श्रीनाथ त्रिपाठी यांनीच चित्रगुप्त यांना १९४६ मध्ये ‘फायटिंग हिरो’, लेडी रॉबिनहूड’ आणि ‘तुफान क्विन’ असे चित्रपट स्वतंत्रपणे संगीतबद्ध करण्यास मिळवून दिले. तिथून पुढे बसंत पिक्चर्सचे ‘होमी वाडीया’ (फीअरलेस नादिया यांचे पती) आणि दीपक पिक्चर्सचे ‘नानाभाई भट्ट’ (निर्माता, दिग्दर्शक मुकेश भट्ट यांचे पिता) ह्यांच्या अनेक स्टंटपट, हाणामारीचे चित्रपट, पौराणिक आणि धार्मिक चित्रपटांना चित्रगुप्त यांनी संगीत दिले. त्यामुळे १९४६ पासून १९५५ पर्यंत चित्रगुप्त ह्यांना त्याच प्रकारचे चित्रपट मिळत गेले. त्यातील गाणी चांगली असली तरी त्या गाण्यांना सुद्धा त्या चित्रपटासारखाच ‘बी’ दर्जा मिळाला होता. १९५२ मधील ‘सिंदबाद द सेलर’ ह्या चित्रपटातील रफी आणि शमशाद बेगम यांनी गायलेले ‘अदा से झुमते हुये, दिलोंको चुमते हुये’ ह्या गाण्यामुळे चित्रगुप्त यांना थोडीफार ओळख मिळाली.
चित्रगुप्त हे अतिशय प्रतिभावान संगीतकार होते, परंतु त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कमी बजेटचे, हाणामारीचे आणि ‘बी’ ग्रेड चित्रपटांना संगीत दिले. चित्रगुप्त हे एकमेव संगीतकार असावेत ज्यांनी ‘बी’ ग्रेड, ‘सी’ ग्रेड आणि ‘ए’ ग्रेड चित्रपट, अशा सर्व दर्जांच्या चित्रपटांना संगीत दिले आहे. AVM Production चा अपवाद सोडला तर त्यांच्यापाठीमागे अन्य दुसरा मोठा बॅनर क्वचितच दिसला. त्यांच्या सुरुवातीच्या म्हणजेच १९४६ ते १९५५ ह्या काळातील सुमारे ३६ चित्रपटांपैकी बरेच चित्रपट हे ह्या आधी सांगितल्याप्रमाणे स्टंटपट, हाणामारी, रहस्यपट असे चित्रपट होते. ह्या चित्रपटांत फीअरलेस नादिया आणि जॉन कावस ही त्या काळची लोकप्रिय जोडी लक्ष वेधून घ्यायची, गाण्याकडे कोणाचे लक्षच नसे, गाण्यांना कमी महत्व असायचे. म्हणून त्या चित्रपटांतील चित्रगुप्त यांची फार गाजली नाही.
परंतु त्यांच्या पौराणिक आणि धार्मिक चित्रपटांतील गाणी मात्र गाजली. १९४९ च्या ‘भक्त पुंडलीक’ ह्या चित्रपटातील ‘माता पिता कि सेवा कर के’, ‘दर्शन दे दो चक्रधर सूदर्शनधारी’, ‘जय मुरलीधर मोहन गिरधर’ ह्या तिन्ही गाण्यांना चित्रगुप्त यांचा आवाज आहे तसेच चित्रगुप्त यांनी ‘आखोंसे काही दिल ने सुना’ हे उमादेवी (अर्थात टुणटुण) ह्यांच्या बरोबर द्वंद्वगीत गायले आहे.
चित्रगुप्त यांनी १९४६ ते १९८८ पर्यंत सुमारे १५० चित्रपटांना संगीत दिले. चित्रगुप्त यांना १९६८ मध्ये हृदयविकाराचा झटका आणि १९७४ मधील पक्षाघाताचा झटका येवूनही त्यांची कारकीर्द संपली नाही. पक्षाघातातून ९० टक्के बरे होऊन ते पूर्ववत कामाला लागले आणि पुढची आणखी १३-१४ वर्षे चित्रपटांना आणखी १८-१९ चित्रपट केले. हे एक दुर्मिळ उदाहरणच म्हटले पाहिजे. शिवाय त्यांच्यावर चित्रपट निर्मात्यांच्या असलेल्या विश्वासाचे ते एक प्रतीक आहे.
चित्रगुप्त यांची बहुतांश गाणी मजरुह सुलतनापूरी यांनी लिहिलेली आहेत, त्या खालोखाल राजींदर कृष्ण आणि चित्रगुप्त यांचे मित्र प्रेम धवन यांचे नाव घेता येईल. मजरुह सुलतनापूरी आणि राजींदर कृष्ण यांनी चित्रगुप्त यांच्यासाठी विविध प्रसंग आणि विविध भावार्थ असलेली अप्रतिम गाणी लिहिली आहेत. सुप्रसिद्ध गीतकार साहिर आणि कवी शैलेंद्र हे सुद्धा चित्रगुप्त यांचे घनिष्ठ मित्र होते.
चित्रगुप्त यांच्या घरी कवी शैलेंद्र आल्यावर दोघेही त्यांची मातृभाषा म्हणजेच भोजपूरीमध्ये बोलत बसत. म्हणून १९६२-६३ मध्ये निर्मित ‘गंगा मईया तोहे पियरी चढ़इबो’ ह्या पहिल्या भोजपूरी भाषेतील चित्रपटात चित्रगुप्त आणि कवी शैलेंद्र एकत्र आले आणि त्यांनी एक इतिहास रचला. ‘गंगा मईया….’ पाठोपाठ ‘लागी नाहीं छूटे राम’, ‘भौजी’, ‘भैया दूज’ और ‘गंगा’ इत्यादी भोजपूरी चित्रपट चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केले. मजरुह यांनी देखील चित्रगुप्त यांच्यासाठी भोजपुरीत गाणी लिहिली आहेत.
चित्रगुप्त यांनी शास्त्रीय संगीताचा आणि पाश्चिमात्य सुरावटीचा छान वापर करून गाणी बसविली आहेत. कोणीही सहजपणे ती गाणी गुणगुणावीत अशा त्यांच्या गाण्यांच्या चाली ह्या सहज सोप्या असत. ‘मैं चूप रहूंगी’ ह्या चित्रपटातील सर्वच गाणी अशीच होती. ‘मेरे दिल कभी तो कोई आयेगा’, ‘तुम्ही हो माता पिता तुम्ही हो’, ‘कोई बता दे, दिल है कहा’, ‘चांद जाने कहा खूप गया’ अशी एकाहून एक सुंदर गाण्यांमुळे चित्रगुप्त यांचे नाव आणि गाणी घराघरात गेली.
चित्रगुप्त यांनी चित्रपटांना संगीत देताना कधी बॅनर किंवा पैशाचा विचार केला नाही, किंबहुना आपल्या कामाचे दाम खणखणीत मोजून घ्यावे असे ते कधीच वागले नाही. चित्रगुप्त चित्रपटामागे केवळ २०,००० रुपये मानधन घेत असत, जेव्हा इतर संगीतकारांनी लाखाचा आकडा कधीच पार केला होता. कमी मानधन असले, चित्रपट ‘बी’ ग्रेडचा आहे किंवा कुठल्या विषयावर आहे, निर्माता कोण आहे, कलाकार कोण आहेत ह्याचा त्यांच्यावर काहीच फरक पडला नाही. मानधन कमी असले तरीही त्यांनी गाण्यांचा दर्जा कायम ‘ऐ’ ग्रेडचाच ठेवला. त्याशिवाय त्यांच्या उमेदवारीच्या काळात त्यांना सहकार्य करणारे ‘होमी वाडिया’ आणि ‘नानाभाई भट्ट’ यांचे उपकार चित्रगुप्त कधीही विसरले नाही, त्या दोघांच्या शेवटच्या चित्रपटापर्यंत चित्रगुप्त यांनी त्यांना संगीत दिले. तसेच त्या दोघांनीही १९४६ पासून १९७८-१९८० पर्यंत चित्रगुप्त यांचे साथ सोडली नाही.
चित्रगुप्त यांच्या गाण्यात विविधता होती. काळाच्या ओघात त्यांची स्टाईल ही बदलत गेल्याचे दिसून येते.
संगीतकार चित्रगुप्त हे स्वतः चांगले गायक होते, शिवाय त्यांना गायनाची हौस होतीच. त्यांची हौस त्यांनी स्वतःच पूर्ण केली. चित्रगुप्त यांनी हिंदी चित्रपटात सुमारे ५० भजने गायली आहेत. शिवाय इतर गायिकांबरोबर युगल गाणे देखील गेले आहे. असेच एक दुर्मिळ गाणे आता ऐकूयात.
पुढचे गाणे आहे, स्वतः संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार ह्या दोघांच्या आवाजातील एक मजेदार गीत: ‘सर्दी का बुखारी बुरा’, चित्रपट: मनचला (वर्ष १९५३), कवी: राजा मेहदी अली खान.
ह्याच चित्रपटात चित्रगुप्त यांनी गायलेले अप्रतिम भजन आहे, ‘भगवान तुझे मै खत लिखता पर तेरा पता मालूम नही’. (तसेच या चित्रपटात चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार ह्या दोघांनी गायलेले आणखी एक गाणे आहे, ‘नही दान दिया, नही पुण्य किया’. परंतु ह्या गाण्याचे संदर्भ किंवा गाणे सापडत नाहीत).
१९५४ मध्ये किशोरकुमार अभिनीत चित्रपट प्रदर्शित झाला, ‘मिस माला’. ह्या चित्रपटातील किशोरकुमार यांचे एक एकल आणि एक युगल गाणे (सोलो आणि ड्युयट) ऐकूयात.
पहिले गाणे: ‘मंजिल कहाँ मेरी, गुलशन कहाँ मेरा’, चित्रपट: मिस माला (वर्ष १९५४), कवी: अंजुम जयपुरी, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
दुसरे गाणे: ‘नाचती झूमती मुस्कराती आ गई प्यार की रात’, चित्रपट: मिस माला (वर्ष १९५४), कवी: अंजुम जयपुरी, गायक: किशोरकुमार आणि गीता दत्त, संगीतकार: चित्रगुप्त. १९५४ मधील हे गाणे जरा काळाच्या पुढचे वाटते.
१९५४ पासून मात्र चित्रगुप्त आणि किशोरकुमार ह्या जोडीच्या गाण्यात खंड पडलेला दिसतो. दोघांचा पुढचा चित्रपट आढळतो, तो एकदम १९६३ चा ‘एक राज’. १९६३ ते १९७३ ह्या १० वर्षात दोघांचे एकूण ७ चित्रपट आले. त्यातील काही गाणी आता आपण ऐकूयात. कारण ह्याच ७ चित्रपटांमध्ये संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार ह्या जोडीच्या सांगीतिक सहयोगाने उच्च पातळी गाठलेली दिसते.
१९६३ पर्यंत किशोरकुमार हे गायक-नट म्हणून चांगलेच नावारूपाला आलेले होते, तरी देखील किशोरकुमार यांना उडत्या चालीची, दुःखी, विनोदी अशा प्रकारची गाणी जास्त मिळायची. शास्त्रीय संगीतावर (Semi Classical) आधारीत गाणी किशोरकुमार यांना गायला कुठलाच संगीतकार देत नव्हता. उलट पडद्यावर जरी किशोरकुमार असला तरी देखील तशा प्रकारच्या गाण्यासाठी पार्श्वगायक म्हणून मो. रफी यांचा आवाज काही संगीतकारांनी वापरला आहे. उदा. १९५८च्या ‘रागिणी’ चित्रपटात ओ. पी. नय्यर यांनी किशोरसाठी मो. रफी यांच्याकडून ‘मन मोरा बावरा’ हे गाणे गाऊन घेतले.
एकजात सर्वच संगीतकारांनी शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यासाठी वाळीत टाकलेल्या किशोरकुमार यांना चित्रगुप्त यांनी १९६३च्या ‘एक राज’ ह्या चित्रपटात ‘पायलवाली देखना…’, हे मारू बिहाग रागावर आधारित गाणे गायला देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आणि किशोरकुमार ह्यांनी देखील हे शिवधनुष्य लीलया पेललेले दिसते. कसे ते प्रत्यक्ष ऐकूयात.
गाणे: ‘पायलवाली देखना, यही पे कही दिल है…’, चित्रपट: एक राज (वर्ष १९६३), कवी: मजरुह सुलतानपुरी, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
ह्याच ‘एक राज’ चित्रपटातील किशोरकुमार यांचे दुसरे एकल गाणे हे किशोर यांचे एक सर्वोत्कृष्ठ गाण्यांपैकी एक आहे, असे म्हणावे लागेल.
ऐकूया गाणे, ‘अगर सुन ले तो एक नगमा हुजुर यार लाया हूँ… ‘, चित्रपट: एक राज (वर्ष १९६३), कवी: मजरुह सुलतानपुरी, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
‘एक राज’ चित्रपटातील एक युगल गीत आता ऐकूया.
गाणे: ‘अजनबी से बन के करो ना किनारा’, चित्रपट: एक राज (वर्ष १९६३), कवी: मजरुह सुलतानपुरी, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
ह्याच चित्रपटातील अजून एक युगल गाणे ऐकवण्याचा मोह आवरत नाहीय, चला ते गाणे आपण ऐकाच.
गाणे: ‘नगमा ए दिल को छेड़ के’, चित्रपट: एक राज (वर्ष १९६३), कवी: मजरुह सुलतानपुरी, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
१९६३च्या ‘एक राज’ ह्या चित्रपटात किशोरकुमार नायकाच्या मुख्य भूमिकेत होते. १९६४ मध्ये किशोरकुमार अभिनीत अजून एक चित्रपट आला, ‘गंगा की लहरें’, त्याला सुद्धा चित्रगुप्त यांचे संगीत होते. ह्या चित्रपटातील गाणी खूपच गाजली. विशेषत: चित्रपटाचे शीर्षक गीत. चला आता ऐकूयात ‘गंगा की लहरें’, चित्रपटाचे शीर्षक गीत.
गाणे: ‘मचलती हुई हवा में छम छम…’, चित्रपट: गंगा की लहरें (वर्ष १९६४), कवी: मजरुह सुलतानपुरी, गायक: किशोरकुमार, लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त. ह्या गाण्यात चित्रगुप्त यांनी स्त्री आणि पुरुष या दोन्ही कोरसचा वेगवेगळा पण छान वापर केलेला जाणवतो. शिवाय लतादीदींच्या आवाजाला ‘इको’ परिणाम दिलेला ही जाणवतो. ह्या सर्व वेगळेपणामुळे आणि हरिद्वार तसेच ऋषिकेशच्या काठावरील गंगामातेच्या दर्शनाने गाण्यातील दृश्ये अधिकच मोहवून टाकतात. म्हणून मुद्दाम ह्या गाण्याचा व्हिडीओ येथे दिला आहे. आपण त्याचा आनंद घ्यावा.
जरासे कळायला लागल्यावर (साधारण १९७२-७५चा काळ) हे गाणे ऐकायला मिळाले तेव्हा बालवयात देखील ‘किशोर’ इतके छान गाऊ शकतो तर हल्ली किशोर नुसत्या पाट्या टाकायाचे काम का करतो हा प्रश्न माझ्या मनाला सतत पडायचा. असो, तो वेगळा विषय आहे.
ह्याच चित्रपटातील एक छान युगल गाणे आपण ऐकूया.
गाणे: ‘छेडो ना मेरी जुल्फे…’, चित्रपट: गंगा की लहरें (वर्ष १९६४), कवी: मजरुह सुलतानपुरी, गायक: किशोरकुमार, लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.
‘गंगा की लहरें’ ह्याच चित्रपटातील किशोरकुमार यांचे एक गाणे किशोर यांच्या चाहत्यांना नक्की आवडेल म्हणून देत आहे. हे गाणे किशोरकुमार यांच्या खास पठडीतले गाणे असल्यामुळे त्यांनी छानच गायले आहे.
गाणे: ‘जानेमन, हंस लो जरा..’, चित्रपट: गंगा की लहरें (वर्ष १९६४), कवी: मजरुह सुलतानपुरी, गायक: किशोरकुमार, लता मंगेशकर, संगीतकार: चित्रगुप्त.
१९७१च्या ‘संसार’ ह्या चित्रपटातील किशोरकुमार यांची तीन गाणी आपण आता ऐकूयात.
पहिले गाणे: ‘बस अब तरसाना छोडो…’, चित्रपट: संसार (वर्ष १९७१), कवी: साहिर, गायक: किशोरकुमार आणि आशा भोसले, संगीतकार: चित्रगुप्त.
दुसरे गाणे: ‘हाथों में किताब, बालों में गुलाब…’, चित्रपट: संसार (वर्ष १९७१), कवी: साहिर, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
तिसरे गाणे: ‘मिले जितनी शराब..’, चित्रपट: संसार (वर्ष १९७१), कवी: साहिर, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
१९७१च्या ‘साज और सनम’ ह्या चित्रपटातील किशोरकुमार यांची दोन गाणी आपण आता ऐकूयात.
पहिले गाणे: ‘ये मेरी बला जाने’, चित्रपट: साज और सनम (वर्ष १९७१), कवी: कैफी आजमी, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
दुसरे गाणे: ‘दिलसे नजर तक तेरे उजाले’, चित्रपट: संसार (वर्ष १९७१), कवी: कैफी आजमी, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
चित्रगुप्त यांचा शेवटचा चित्रपट ‘शिव गंगा’ १९८८ मध्ये आला होता. तत्पूर्वी १९८२ मध्ये आलेल्या ‘ज्वाला दहेज की’ ह्या चित्रपटातील एक युगल गाणे आपण ऐकूयात. १९८० ते १९८८ पर्यंत चित्रगुप्त यांनी केवळ पाचच चित्रपट केले, त्यामुळे १९८२ मध्ये आलेल्या ‘ज्वाला दहेज की’ ह्या चित्रपटातील किशोरकुमार यांचे गाणे हे चित्रगुप्त आणि किशोरकुमार ह्या जोडीचे शेवटचे गाणे असावे, असे मला वाटते. कारण १९८२ ते १९८८ या दरम्यान इतर कुठल्याच चित्रपटात किशोरकुमार यांचे गाणे आढळले नाही.
आता ऐकूयात गाणे: ‘माना सफर है मुश्किल मंजिल भी दूर है’, चित्रपट: ज्वाला दहेज की (वर्ष १९८२), कवी: अंजान, गायक: किशोरकुमार आणि आशा भोसले, संगीतकार: चित्रगुप्त.
आजच्या भागातील शेवटची दोन गाणी आता आपण ऐकावीत. हि दोन म्हणजे संगीतकार चित्रगुप्त आणि किशोरकुमार यांच्या सहयोगाने निर्माण झालेली दोन सर्वोत्तम गाणी आहेत असे मला वाटते. दोघांनीही ह्या गाण्यात आपले सर्वस्व ओतल्याचे जाणवते. दुर्देवाने दोन्ही गाणी खूपच कमी लोकांना माहिती आहेत.
त्यातील पहिले गाणे: ‘चंदा की किरणों से लिपटी हवाये’, चित्रपट: इंतजार (वर्ष १९७३), कवी: वर्मा मलिक, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त.
दुसरे गाणे: ‘मैं हंसू के इस पे रोऊ’, चित्रपट: माँ (वर्ष १९६८ – अप्रदर्शित), कवि: मजरूह, गायक: किशोरकुमार, संगीतकार: चित्रगुप्त. ह्या गाण्यातील किशोरकुमार यांचा आवाज वेगळाच आणि अस्सल आहे. हा किशोरकुमार खूप कमी वेळा ऐकायला मिळतो. १९६८ मधील गाणे असून देखील हे गाणे कुठल्याही कालखंडाला शोभून दिसेल, हे गाणे कालातीत आहे असे मला वाटते.
आताच ऐकलेली गाणी पाहता संगीतकार चित्रगुप्त हे प्रतिभेत कुठेच कमी नव्हते हे जाणवते. विविध रंगाची, ढंगाची, प्रसंगाची गाणे हे लीलया बनविता असत, तसेच त्यांचे संगीत कालानुरूप बदलत गेलेले सुद्धा जाणवते.
संगीतकार चित्रगुप्त आणि किशोरकुमार यांचा सहयोग तसा कमीच राहिला म्हणून आपल्याला दोघांची खूपच कमी गाणी ऐकायला मिळाली. त्यातही वर उल्लेख केलेल्या काही चित्रपटात किशोरकुमार हे नायक अथवा सहनायकाच्या भूमिकेत होते, म्हणून त्यांचा आवाज वापरला होता. तरी सुद्धा जे गाणी दोघांने एकत्र केली ती फारच अप्रतिम झाली. आताच आपण ऐकलेल्या गाण्यांविषयी मी काही टिप्पणी करण्याचे टाळले आहे, मी फक्त माहिती दिली आहे. गाणी ऐकतानाच त्या त्या गाण्यांची वैशीष्ट्ये आपणा स्वतःलाच जाणवली असणार, आणि ‘अरे, हि गाणी आपण या आधी का नाही ऐकली’ हा विचार मनात नक्की येणार. आणि हाच उद्देश आहे, हा लेख लिहून हि अविस्मरणीय गाणी पुन्हा श्रोत्यांपुढे ठेवण्याचा.
चित्रगुप्त यांच्या गाण्यांविषयी काही रंजक तथ्ये! (Unforgettable songs of Lata and Chitragupta)
- चित्रगुप्त श्रीवास्तव १९४६ पासून संगीतकार म्हणून कार्यरत होते आणि गाजले देखील होते. तरी देखील १९४६ पासून सुमारे ३६ चित्रपटांना संगीत देवूनही चित्रगुप्त यांनी लतादीदींचा आवाज एकाही गाण्याला वापरला नव्हता. गायिका लतादीदी आणि संगीतकार चित्रगुप्त ह्यांनी प्रथम एकत्र काम केले ते १९५५ साली ‘शिवभक्त’ ह्या धार्मिक चित्रपटात.
- साठच्या दशकात अभिनेता चंद्रशेखर आणि अभिनेत्री कुमकुम यांच्या प्रमुख भूमिका असलेले तीन चित्रपटांना चित्रगुप्त यांचे संगीत होते. चित्रपट आहेत: तेल मालिश बूट पॉलीश, ‘नाचे नागीन बाजे बीन आणि काली टोपी लाल रुमाल.
- चित्रगुप्त यांनी सुमारे ५० भजने गायली आहेत.
- साठच्या दशकात संगीतकार ओ. पी. नय्यर यांचा बोलबाला झाल्यावर अनेक निर्माते अन्य संगीतकारांवर ओ. पी. नय्यर यांच्या ढंगाचे संगीत द्यावे असे दडपण टाकू लागले. चित्रगुप्त यांच्यावर देखील असेच दडपण आले असावे, आणि म्हणूनच त्यांनी १९५९च्या ‘काली टोपी लाल रुमाल’ ह्या चित्रपटात ओ. पी. नय्यर स्टाईलची गाणी केली. ‘यारों का यार लिए नखरे हज़ार लिए’, ‘ओ काली टोपी वाले जरा नाम तो बता’ आणि ‘गोरी ओढ के मलमल निकली’ अशी तीन द्वंद्वगीते रफी आणि आशा भोसले यांना देवून चित्रगुप्त यांनी ओ. पी. नय्यर स्टाईलमध्ये गाणी देऊन निर्मात्याची मागणी पूर्ण केली, पण परत त्या वाटेला गेले नाही.
- चित्रगुप्त यांची दोन मुले आनंद आणि मिलिंद यांनी १९८४ मध्ये ‘अब आयेगा मजा’ चित्रपटाद्वारे संगीतक्षेत्रात प्रवेश केला आणि ‘कयामत से कयामत तक’ ह्या चित्रपटाला उत्तम संगीत देवून १९८८चा उत्तम चित्रपट संगीताचा ‘फिल्मफेअर’ अवॉर्ड मिळविला. त्यांची ‘दिल’, ‘बेटा’, ‘अनाडी’, ‘बोल राधा बोल’ ह्या चित्रपटातील गाणीही खूपच गाजली.
- हिंदी चित्रपट सृष्टीत झगमागाटापासून कायम उपेक्षित राहिलेले संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव आणि हरहुन्नरी कलाकार किशोरकुमार यांच्या स्मृतीला अभिवादन!
संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta): लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, मोबाईल क्र. ८९९९७७५४३९. लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत.
सूचना: लेखातील गाण्याचे सर्वाधिकार आणि स्वामित्व हे त्या गाण्याचे अधिकार असलेल्या कंपनीकडे आहेत.
या लेखात वापरलेली गाणी हि केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी आणि माहितीकरिता वापरली आहेत. लेखकाला त्यापासून कुठलाही व्यावसायिक लाभ मिळण्यासाठी सदर गाणी वापरली नाहीत. जर कोणास आक्षेप असेल तर आणि जर त्यांनी तसे कळविल्यास सदर गाणे या लेखातून काढून टाकण्यात येईल.
संदर्भ आणि ऋणनिर्देशन संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta):
- http://downmelodylane.com/chitragupt.html
- https://www.hindigeetmala.net/
- https://en.wikipedia.org/wiki/Chitragupt_(composer)
Disclaimer: Copyrights of this article is limited to the writeup and content used in this article. Copyrights of audio and video are reserved with respective owners. We have used/provided links to audio and video through youtube.com
आमचे इतर लेख :
- https://charudattasawant.com/2022/04/03/bhajans-by-lalitadevi-shastri/
- https://charudattasawant.com/2022/05/08/songs-of-lata-and-chitragupta/
हिंदी गाण्यांचे आमचे इतर लेख वाचा
ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.
आजचा हा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. पुढील भागात आपण जाणून घेवूयात संगीतकार रवी आणि लता मंगेशकर यांची गाणी! आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.
